कोल्हापूर : आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तक आले आहेत. तुम्ही आम्ही आणि ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहोत असे वक्तव्य खासदार संजय मंडलिक यांनी केल्यानंतर कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांनी यावर प्रतिक्रया दिली आहे. त्यांनी मंडलिकांचे वक्तव्य हे स्वतःच्या स्वार्थासाठी असून त्यांनी महाराजांची माफी मागावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

संजय मंडलिक यांनी शाहू महाराज यांच्यावर केलेली टीका ही स्वत:च्या स्वार्थासाठी केली आहे, कोल्हापूरकर हा अपमान सहन करणार नाहीत, सुरुवात त्यांनी केलीय, शेवट कोल्हापूरची जनता करेल अशा शब्दात काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांना फटकारले आहे. आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे विधान खासदार संजय मंडलिक यांनी केलं आहे. यानंतर कोल्हापुरात शाहूप्रेमी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. संजय मंडलिक यांनी केलेल्या वक्तव्यावर त्वरित माफी मागावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.

सतेज पाटील म्हणाले की, कोल्हापूरकर हा अपमान सहन करणार नाहीत, हा छत्रपती घराण्याचा अपमान केला आहे. कुठल्याही परिस्थितीत जनता भीक घालणार नसल्याचे ते म्हणाले. तसेच यांच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. कोण सल्लागार आहेत माहीत नाही की स्वत: आहेत माहीत नाही. कुस्ती करा पण खालच्या पातळीवर टीका योग्य नसल्याचे सतेज पाटील म्हणाले. ते म्हणाले की, शाहू महाराजांवरील टीकेला कोल्हापूरची जनता योग्य उत्तरे देईल. शाहूप्रेमी याचा निषेध व्यक्त करतील, असे सांगतिले. त्यांनी सांगितले की, महाराजांवर आम्ही वैयक्तिक टीका करणार नाही, असे सांगितले होते. त्यांची वक्तव्ये पब्लिक डोमेनमध्ये आहेत, मग आता चिट्टी कोणी लिहून दिली का? असा टोला त्यांनी लगावला. कोल्हापुरी भाषेत उत्तर द्यायची वेळ आल्यास देतील, असा इशाराही सतेज पाटील यांनी दिला.

सतेज पाटील म्हणाले की, आपल्यावर एक लाखांचं लीड पडणार हे लक्षात आल्यावर त्यांनी अशी वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहेत. या वक्तव्याचे प्रायश्चित्त कोल्हापूरची जनता त्यांना देईल. मात्र, त्याआधी त्यांनी माफी मागावी. आता बाजू सांभाळून घेण्यासाठी प्रवीण दरेकरांकडून जुन्या गोष्टी उकरून काढल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या वक्तव्याची दखल घेत याबाबत खुलासा करावा. वैयक्तिक टीकेची सुरुवात आम्ही केली नाही या सगळ्याचा शेवट कोल्हापूरची जनता करेल, असा इशारा त्यांनी दिला.

काय म्हणाले संजय मंडिलक?
आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तक आले आहेत. तुम्ही आम्ही आणि ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थानं पुरोगामी विचार जपला. मल्लाला हात लावायचा नाही मग कुस्ती कशी होणार? अशी विचारणा मंडलिक यांनी केली होती.