प्रेमसंबंधातून एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. लग्नासाठी तगादा लावल्यामुळे रागाच्या भरात प्रियकरानं मित्राच्या मदतीनं प्रेयसीवर सपासप वार करत हत्या केली. हा धक्कादायक प्रकार कल्याण जवळ असलेल्या टिटवाळा परिसरात (Titwala, kalyan) घडला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार टिटवाळ्यातील गोवेली परिसरात 12 डिसेंबरला एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेवर धारदार शस्त्रानं तब्बल 35 वार करण्यात आले होते. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. या तपासामध्ये हा प्रकार समोर आला असून या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, रुपांजली जाधव ही विवाहित असून तिला तीन मुलं आहेत. दोन वर्षांपासून रुपांजलीचे पुण्यात राहणाऱ्या जयराज चौरे यांच्याशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे रुपांजलीने जयराजकडे लग्नासाठी तगादा लावला व ब्लॅकमेल करणे सुरु केले. त्यामुळे संतापलेल्या जयराजनं रुपांजलीला संपवण्याचा निर्णय घेतला.

जयराज आणि त्याचा मित्र सुरज घाटे यांनी रुपांजलीला खरेदीचे कारण सांगत टिटवाळा येथील गोवेली परिसरात बोलावले व तीच्यावर धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केली. या प्रकरणात हत्या करणारा प्रियकर जयराज चौरेसह त्याचा मित्र सूरज घाटे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.