कोल्हापूर ( प्रतिनिधी ) शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत या दौऱ्या दरम्यान त्यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्याशी वाद झालेल्या व्यक्तीबाबत पोलिस प्रशासनाला विचारणा करत तक्रार नोंदवण्यास सांगितली. यावर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी भाष्य केले असून खासगी सावकारासाठी विरोधी पक्षनेत्याने पोलीसांना धारेवर धरणे लाजिरवाणी बाब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजेश क्षीरसागर म्हणाले की, खासगी सावकारी विरोधात सर्वसामान्य कुटुंबियांना न्याय मिळवून देताना राजकीय बदनामी पोटी आखण्यात आलेल्या षड्यंत्राला विरोधी पक्ष पाठीशी घालत असल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले. राजकीय बदनामी करण्यासाठी एका विरोधी पक्षनेत्याला खाजगी सावकाराच्या बाजूने उभे राहून पोलीस प्रशासनाला धारेवर धरावे लागते, हे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच घडलेली गोष्ट आहे. म्हणजेच विरोधी पक्षनेते कॉंग्रेस प्रणीत खासगी सावकारीला पाठबळ देत आहेत.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोल्हापुरात येवून आज गरळ ओकली. एखाद्या लोकप्रतिनिधीचा एकेरी भाषेत उल्लेख करण्यापर्यंत त्यांची मजल गेली यावरून त्यांच्या संस्काराचे दर्शन होते. अंबादास दानवे हे जनतेतून निवडून न येता मागच्या दरवाजाने आमदार होवून विरोधी पक्षनेते बनले आहेत. त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नाची जाण नाही. राजकीय हेतूने अंबादास दानवे यांनी केलेल्या स्टंटबाजीसह छत्रपती संभाजीनगरमध्ये येवून उत्तर देवू, असे प्रतिउत्तर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले.