ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी अनेक शिवसैनिकांना घडवलं.त्यापैकीच एक म्हणजे त्यांच्यासोबत कायम राहणारे खासदार राजन विचारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हे दोघेही ठाण्यातील आनंद दिघे यांचे शिष्य मानले जातात.आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्याची जबाबदारी मुख्यमंत्री शिंदेंकडे आली.एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर राजन विचारे ठाकरे यांच्यासोबतच राहिले.आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोप होत आहेत.  कोणी दाढी वाढविली म्हणजे दिघे साहेब होत नसतो. दिघे साहेब हे व्यक्तीमत्त्व एकदाच होऊन गेले. त्यांची ड्युप्लिकेटगिरी करून कोणाला दिघे साहेब होता येणार नाही. त्यासाठी दिघेसाहेबांसारखी कामे करावी लागतात. अशी टीका शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

राजन विचारे यांनी त्यांच्या इन्टाग्राम या समाजमाध्यमावर मुलाखतीचा काही भाग प्रसारित केला आहे. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी टीका केली आहे.शिवसेना आणि ठाणे शहर हे वेगळे समीकरण आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी तळागाळातील अनेक शिवसैनिकांना घडविले. राजन विचारे यांना उद्धव ठाकरे यांनी ठाणे लोकसभा निवडणूक लढविण्याची पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर दुसरीकडे महायुतीचा ठाणे लोकसभेचा उमेदवार ठरलेला नाही. असे असले तरी राजन विचारे यांनी ठाणे, नवी मुंबई आणि मिरा भाईंदर शहरात नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरू केल्या आहेत. तसेच समाजमाध्यमांचा वापरही करण्यास सुरूवात केली आहे.

काही महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी मुलाखतीत खासदार राजन विचारे यांना प्रश्न विचारला की ‘काहीजण आपण दिघे साहेबांचे खरे पट्टशिष्य आहोत असे म्हणतात नेमकी परिस्थिती काय? त्यावर उत्तर देताना राजन विचारे म्हणाले की, दाढी वाढविली म्हणजे, दिघे साहेब होता येत नाही. दिघे साहेब हे व्यक्तीमत्त्व एकदाच होऊ शकते. असे व्यक्तीमत्त्व पुन्हा होऊ शकत नाही. दाढी वाढवून, चेहरे बदलून डुप्लिकेटगिरी करून, दिघे साहेब किंवा बाळासाहेब होता येत नसते. त्यासाठी तसे काम करावे लागते.