रत्नागिरी : महायुतीमधील अनेक जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दोन दिवसांपूर्वी भाजपची 12 वी यादी जाहीर झाली. यामध्ये सातारचे उदयनराजे भोसले यांचे नाव होते. परंतु रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा अजिन सुटलेला नव्हता. अखेर हा तिढा सोडविण्यात महायुतीला यश आलं आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरुन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चांचं सत्र सुरू होतं. भाजपकडून नारायण राणे हे आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होते. तर मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेची असल्याने ती शिवसेनेला मिळावी यासाठी आग्रही होते. उदय सामंत हे आपले बंधू किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी यसथिओ प्रयत्न करत होते. अखेर या जागेचा तिढा सुटल्याची माहिती आहे. हा मतदारसंघ भाजपच्या पारड्यात पडला आहे. आज भाजपची 13 वी उमेदवारांची यादी जाहीर झाली. यामध्ये अखेर नारायण राणेंचं नाव जाहीर झालं आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नसताना या मतदारसंघात प्रचाराचा धडाका मात्र जोरात सुरू झाला होता. सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडून द्या असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मतदारांना आवाहन केलं होतं.

त्यामुळे नारायण राणेंच संभाव्य उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात होती. तशा प्रकारचा प्रचार देखील केला जातं होता. दरम्यान आज भाजपने अधिकृत उमेदवाराची घोषणा केली आहे. ही जागा भाजपच्या पारड्यात पडली आहे. या जागेवर नारायण राणे अधिकृत उमेदवार जाहीर झाले आहेत.

शिवसेनेने खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर आज महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराच्या कामाला सुरुवात केली आहे. या मतदारसंघात बेरोजगारी, रिफायनरीसह विविध प्रकल्प, जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था, महागाई यांसह अनेक मुद्दे प्रचारात महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्ताधाऱ्यांवर कोणताही विकास केला नसल्याचा आरोप केला जात आहे. तर ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राऊत हे विकास प्रकल्पांना हेतुपुरस्सर विरोध करीत असल्याची टीका सत्ताधारी करीत आहेत.