नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी बहुचर्चित तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गेली वर्षभर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. पंतप्रधानांनी  देशाला संबोधित करताना  या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन केले आहे.

ते म्हणाले की,  तीन कायदे मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केले. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की, आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.  शेतकर्‍यांचाच एक वर्ग कायद्यांना  विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता. या शेतकऱ्यांनाही सर्वांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अनेक माध्यमांतून चर्चा सुरू राहिली. शेतकऱ्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही.

आमचे सरकार लहान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी,  देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, खेड्यातील गरिबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पूर्ण प्रामाणिकपणे, समर्पणाने शेतकऱ्यांसाठी हा कायदा चांगल्या हेतूने आणला आहे. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळण्यासाठी  आम्ही हे कायदे केले. यापूर्वीही अनेक सरकारांनी यावर विचारमंथन केले होते. यावेळीही चर्चा व विचारमंथन झाले. देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला, असेही पंतप्रधान  मोदी म्हणाले.