मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमधील ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला. तसेच, प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांना आज (शुक्रवारी) जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली.

आज दुपारी एक  वाजता मला वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो’, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले.

मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले,’मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल’. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल; पण मी जे केलेले नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही’, असेही ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

चित्रपटाचे विकृतीकरण झालेले हे प्रकरण. या चित्रपटामधून छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच मराठा समाजाची बदनामी झाली. त्यावर आक्षेप घेतल्याने कारवाई होत असेल तर मी महाराजांचा मोठा रक्षक, अभ्यासक आहे. हे सरकार मला रोखू शकत नाही. हे सरकार महाराजांना बदनाम करणाऱ्यांचे आहे की रोखणाऱ्यांच? अनैतिहासिक इतिहास दाखव्यासाठी अटक होणार असेल, तर मी जेलमध्ये जाईन. जामीन पण करणार नाही. ‘थोडी धक्काबुक्की झाली ती कार्यकर्त्यांमध्ये झाली. पण मी या अटकेचे स्वागत करतो, असेही आव्हाड म्हणाले.