कोल्हापुरात आमदार हसन मुश्रीफ तसेच त्यांचे निकटवर्तीयांच्या निवासस्थानावरील छापेमारीने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोम्मया यांच्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कागलची तांबडी माती ही विखारी वृत्ती गाडल्याशिवाय राहणार नाही, असा जहरी इशारा दिला.12 जानेवारीला जिजाऊच्या जन्मस्थळावरून हे वक्तव्य करतोय. असं ही ते म्हणाले.

याबाबत बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, ‘ ईडी आणि सीबीआय या यंत्रणा केंद्र सरकारच्या गुलाम आहेत. अनिल देशमुखांविरोधात गुन्हे दाखल झाले. पण अजूनही त्यात तथ्य सापडलं नाही. किरीट सोमय्या ज्या पद्धतीने फडफड करतायेत, ती भाजपविरुद्ध फडफड करत नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

मिटकरी म्हणाले, ‘ यावेळी सोमय्यांना नेम चुकलाय. त्यांनी हिंदु आणि मुस्लिम असं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे त्यांनी कोल्हापूरच्या शाहूमातीशी पंगा घेतलाय. कागलची तांबडी माती भाजप आणि किरीट सोमय्यांसारख्या विखारी प्रवृत्तींना गाडल्याशिवाय राहणार नाही. ईडा-पिडा टळो आणि महाराष्ट्रातलं हे दळभद्री सरकार जावो, बळीराजाचं राज्य येवो, असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं.