कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाआवास अभियान २०२०-२१ मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेस केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना यांच्या एकत्रित संख्यात्मक प्रगतीनुसार बहुमजली इमारती बांधणे यामध्ये राज्यात प्रथम क्रमाकांचा पुरस्कार घोषित झाला आहे. हा पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे स्वीकारणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदमधील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी दिली आहे.

महाआवास अभियानमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल राज्यस्तरावर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट तालुक्यासाठी गगनबावडा तालुक्यास द्वितीय क्रमाकांचा पुरस्कार घोषित झाला आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनमध्ये सर्वोत्कृष्ट तालुक्यासाठी कागल तालुका तृतीय याप्रमाणे पुरस्कार घोषित झालेली आहेत.

विशेष पुरस्कारामध्ये ग्रामीण गृहनिर्माण अभियंतामध्ये अमित विचारे (पंचायत समिती पन्हाळा) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणीमध्ये गतिमानता आणि गुणवत्ता आणण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त राज्यात ‘अमृत महाअवास अभियान २०२२-२३’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार दि. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होणार आहे.