सातारा (प्रतिनिधी) : भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यापासूनच माढा लोकसभेत रणसंग्राम सुरू झाला आहे. साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांना पहिल्या यादीमध्ये उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे भोसले यांनी, मी अजूनही संन्यास घेतलेला नाही असे म्हणत उमेदवारीसाठी स्पष्ट इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये साताऱ्याची उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

माढामध्ये महायुतीकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील गट कमालीचा आक्रमक झाला असून त्या ठिकाणी मोहिते पाटील गट आणि रामराजे निंबाळकर सुद्धा एकत्र आल्याने माढामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची 19 मार्चला भेट घेतल्याची माहिती य सूत्रांनी दिली आहे. तब्बल दोन तास झालेल्या बैठकीचा तपशील समोर आला नसला, तरी उदयनराजे हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दोन दिवसांपूर्वीच गिरीश महाजन यांनी उदयनराजे यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली होती.

यावेळी गिरीश महाजन यांनी, उदयनराजे यांची भेट घेतल्यानंतर चर्चेत मार्ग काढला जाईल, उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच नसल्याचे म्हटले होते. तसेच संसदीय पक्षाशी चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे साताऱ्यावरून भाजप गोंधळात असल्याचे स्पष्ट झाले होते.