मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगूडमध्ये काल (रविवार) शेतकऱ्यांचा तब्बल २३ एकरातील ऊस जळून खाक झाला. यामध्ये सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र, ही आग विझवण्यासाठी नगरपरिषद अग्निशामक दलाची गाडी असूनही ती आली नाही. याचा निषेध म्हणून आज (सोमवार) शेतकऱ्यांनी मुरगूड नगरपरिषदेत जळलेला ऊस फेकून जाहीर निषेध केला.

मुरगूडमध्ये काल तब्बल २३ एकरातील ऊस जळून खाक झाला. यावेळी मुरगूड नगरपरिषदेची अग्निशामक दलाची गाडी असूनही ते वेळेवर आली नाही. कारण होते ती गाडी पंक्चर आहे. तसेच या गाडीचा ड्रायव्हरही जागेवर नसतो. याची विचारणा केली असता नगरपरिषदेकडून आधिकारी नाही आहेत अशी अनेक उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

त्यानंतर बिद्री साखर कारखाना, मंडलिक साखर कारखाना आणि कागल नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने तब्बल ६ तासांच्या अथक परिश्रमातून आग विझवण्यात यश आले. दरम्यान, आज शेतकऱ्यांनी मुरगूड नगरपरिषदेत कालच्या घटनेचा निषेध म्हणून जळलेला ऊस फेकून जाहीर निषेध केला.