कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज गोकुळच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे प्रेरणादायी मार्ग असल्याचे प्रतिपादन अरुण डोंगळे यांनी केले.

अरुण डोंगळे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व असाधारण होते. विद्वान, शिक्षाविद्या, कायदेपंडीत, समाजसुधारक असलेल्या डॉ.आंबेडकराचे जीवन हे साहस आणि दृढ विश्वासाचा एक प्रेरणादायी मार्ग असून त्यांनी दलित, वंचित वर्ग, शेतकरी, श्रमिक आणि विशेषतः महिला यांना समान अधिकार, सन्मान मिळवून देणाऱ्या समाजाचे स्वप्न डॉ. आंबेडकर यांनी पाहिले होते. त्यांनी समाजाला दाखवलेला मार्ग करुणा, समानता या भावना दृढ करणारा होता.

तसेच डॉ.आंबेडकर यांनी संविधानाच्या स्वरुपात जगातील सर्वात मोठी लोकशाही भारताला दिली आहे. लोकशाही सुद्रुड करण्याच्या दृष्टीने आणि भारताला सर्वार्थाने सक्षम करण्यासाठी भारतातील सर्व लोकांना समान मतदानाचा अधिकार देण्याचे एक महत्वाचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण डॉ.आंबेडकर यांचे विचार आणि जीवनातून काही खास गोष्टी शिकुया आणि त्याचे पालन करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन डोंगळे यांनी केले.

डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले की, भारतामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले. या महापुरुषांपैकी एक अलौकिक तेजस्वी व्यक्तिमत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. त्यांनी दलित वर्गासाठी तसेच जो वर्ग समाजामध्ये कायम अनेक बाबतीत दुर्लक्षिला गेला आहे, अशा सर्वच वर्गांतील. लोकांना त्यांनी लोकतांत्रिक, शांतिपूर्ण, अहिंसहक आणि सामंजस्यपूर्ण साधनांच्या माध्यमातून न्याय मिळवून दिल्याचे सांगितले.

यावेळी संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, मुरलीधर जाधव, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंखे, संकलन व्‍यवस्‍थापक एस. व्ही. तुरंबेकर, दत्तात्रय वाघरे,बी.आर.पाटील, डॉ.दयावर्धन कामत, डॉ.किटे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, अशोक पुणेकर, विनोद वानखेडे, कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.