नाशिक : घाबरून माघार घेतली म्हणणाऱ्यांना छगन भुजबळांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. भुजबळांनी घाबरुन माघार घेतली असं ते म्हणत आहेत. ‘मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही’, असं छगन भुजबळ यांनी नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही, आता कशाला घाबरायचं. माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. किती शिव्या, दादागिरी झाली, पण कधीच घाबरलो नाही असंही भुजबळ यावेळी म्हणाले. नाशिकमध्ये उमेदवार जाहीर करण्यासाठी वेळ लागत असल्याने आपण माघार घेतली असा दावाही त्यांनी केलाय. 

“प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा अयोग्य आहे. प्रकाश शेंडगे हे ओबीसी चळवळीचे नेते आहेत. मला सगळ्यांना सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जे आहे त्या संविधानाने मताचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे. लोकांना कोणाला मत द्यायचं याचा अधिकार असून, भीती दाखवण्याची गरज नाही. समोरच्या कोणी उमेदवारांनी केलं असेल असे मला वाटत नाही. काही अति उत्साही कार्यकर्ते असतात आणि मग ते असं काहीतरी करतात.

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, “मी माघार घेतली कारण उमदेवार जाहीर होण्यासाठी वेळ लागणं योग्य नाही असं वाटलं. माझ्यामुळे पक्षांची, इच्छुकांची अडचण होत असेल तर बाजूला व्हावं असं ठरवलं. पक्षाकडून ज्याला उमेदवारी जाहीर केली जाईल त्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल”.प्रकाश शेंडगे किंवा कोणत्याही पक्ष, समाजाचा उमेदवार असेल तर लोक ठरवतील. आपण दादागिरीने कोणाला थांबवू शकत नाही. प्रकाश शेंडगे यांच्यावर हल्ला झाला असेल तर पोलिसांनी  त्यांचं सऱक्षण करायला हवं,” असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.