पुणे (प्रतिनिधी) : राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक प्रश्न आहेत. मंत्रिमंडळ विस्तार लवकर म्हणजे कधी होणार, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना विचारला आहे. ते आज पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे, वेगवेगळी संकट येतात, अनेक घटना घडतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झाले आहेत, पालकांसमोर अनेक अडचणी आहेत, विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत, निर्णय कोण घेणार, असा सवाल देखील अजित पवारांनी केला आहे.

आम्ही दोघे आहोत, असे शिंदे-फडणवीस म्हणतात; पण हे दोघे महाराष्ट्राला पुरू शकतात का? याचे तरी आत्मचिंतन, आत्मपरिक्षण करावे. वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने याचा फटका राज्याला बसत आहे, तरी देखील त्यांना त्याचे भान राहिलेले नाही, अशी टीकाही पवारांनी शिंदे-फडणवीसांवर केली.

ते म्हणाले की, शिंदे-फडणवीस यांच्या हातात काहीच नाही. दिल्लीतून सिग्नल मिळाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तोपर्यंत कितीही गप्पा मारल्या तरी त्यांच्या हातातून काहीच घडणार नाही. पूर्वी काँग्रेस आणि शिवसेना असताना मंत्रिमंडळाचे निर्णय महाराष्ट्रात व्हायचे, दिल्लीत निर्णय होत नव्हते, अशी खोचक टीकाही अजित पवारांनी भाजपवर केली.

राज्यात सत्तांतर होऊन महिन्यांपेक्षा अधिकचा कालवधी उलटला असली तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देखील सध्या दिल्लीतच असून, मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आजची दिल्लीवारी महत्वाची मानली जाते, असे म्हटले जात आहे.

सोमवारी म्हणजेच ८ ऑगस्टला शिवसेना कोणाची शिंदेंची की ठाकरेंची या प्रकरणावर देखील सुनावणी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. कारण, सोमवारच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.