कोल्हापूर (प्रतिनिधी) : कचरा संकलन आणि कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. तरीही कचऱ्याचा प्रश्न तसाच आहे. दररोज जमा होणाऱ्या कचऱ्यावर र प्रक्रिया होत नसल्याने लाईन बझारमधील झूम प्रकल्पावर कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च कशावर केला जात आहे. त्यामुळे कचऱ्याच्या कामाची आणि खर्चाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीच्या कोल्हापूर शहरप्रमुख, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोंडाळामुक्त कोल्हापूरसाठी महापालिकेने १६९ टीप्पर घेतले. परंतू, ही वाहने घरोघरी दोन-चार दिवसांतून एकदा जात असल्याने चौकाचौकात, कोपऱ्यांवर कचऱ्याचे ढीग आहेत. खासगी ठेकेदाराकडून घेतलेल्या टीप्पर चालकांवर वर्षाला ३ ते ४ कोटी खर्च केला जात आहे. कोल्हापूर शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने खासगी ठेकेदाराकडून कामगार घेतले आहेत. त्यासाठी कोट्यावधींची उधळपट्टी सुरू आहे. तरीही विनाप्रक्रिया कचरा साठत आहे.

सुमारे साडेचार लाख टन कचऱ्यावर बायोमायनिंगसाठी २० कोटींचा ठेका देण्यात आला. मात्र, कचरा तसाच असून ठेकेदार बीले उचलीत आहे. एकीकडे झूम परिसरात लाखो टन कचरा तसाच पडून साठत आहे. तर दुसरीकडे त्यावर कोट्यवधी रुपये खर्ची पडत आहेत. कोट्यावधी खर्च होऊनही कचरा प्रश्न सुटत नसेल तर मग खर्च कशावर केला जात आहे? हा प्रश्न आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याबाबतची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणीही प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केली आहे.