कुंभोज (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हातकणंगले तालुक्यातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा यासाठी आज कुंभोज-नेज येथे जनजागृती रॅली काढण्यात आली. बाहुबली विद्यापीठच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीत अनेक विद्यार्थी तिरंगा ध्वज हातात घेऊन सहभागी झाले होते. रॅलीत देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. वाद्याच्या गजरात आणि भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. विविध ठिकाणी या रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यानिमित्त देशभक्तीपर गीतासह पुष्पवृष्टी केल्याने परिसरातील वातावरण चैतन्यमय झाले होते. रॅलीमध्ये शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वीर जवानांसह अनेकांनी बलिदान दिले आहे. या सर्वांचा आपण अभिमान बाळगला पाहिजे.