हुपरी (प्रतिनिधी) : गोरगरीब जनतेसाठी तळमळीने काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासाचे प्रतीक आहेत. त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे हे आमचे देखील स्वप्न आहे. त्यासाठीच आपण महायुतीचा आघाडीधर्म पाळत धैर्यशील माने यांच्या पाठीशी राहण्याचा ठाम निर्धार केला असून त्यांना ताराराणी पक्षातर्फे रात्रीचा दिवस करून उच्चांकी मतांनी निवडून आणू असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी आज व्यक्त केला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ येथे आयोजित ताराराणी पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ताराराणीचे शहर अध्यक्ष ज्येष्ठ नेते आण्णासाहेब शेंडूरे होते.

आमदार आवाडे म्हणाले, नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठीच आपण लोकसभा निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आपण थांबलो. फिर एक बार मोदी सरकार येण्यासाठी धैर्यशील माने यांना मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

तसेच खा. माने यांच्या काळांतील तीन वर्षे कोरोना आणि महापुरामुळे वाया गेली असतानाही उर्वरीत केवळ दोन वर्षात हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खा.धैर्यशील माने यांनी मतदारसंघातील चकाचक रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक वसाहतीसाठी तब्बल आठ हजार दोनशे कोटींचा निधी केंद्र आणि राज्य शासनासी समन्वय साधत खेचून आणला आहे. अजूनही निधी आणून मतदारसघाचा रचनात्मक विकास साधण्याचे व्हिजन डोळ्यासमोर असणाऱ्या नेत्यांकडेच या मतदारसंघाचे नेतृत्व असणे गरजेचे असल्याचे आवाडे म्हणाले.

धैर्यशील माने म्हणाले, पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी यांनी देशातील 130 कोटी पैकी 80 कोटी गरीब जनतेला मोफत धान्य उपलब्ध करून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक गावागावात भरघोस निधी आणू शकलो. गेल्या दोन वर्षात 800 कोटीवर निधी एका हातकणंगले तालुक्यात आणला असून आपल्यावर टीका करणाऱ्यांनी हे ध्यानात घ्यावे. देशाचे नेतृत्व घडविणारी ही निवडणूक असून मी निमित्तमात्र आहे. निवडणूकीत आमदार प्रकाश आवाडे यांच्या पाठिंब्यामुळे दहा हत्तींचे बळ मिळालेले आहे. भविष्यकाळात राहुल आवाडे यांच्यासाठी आपण दोन पाऊल पुढे राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे, उद्योगपती महावीर गाट, गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव, जवाहरचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, संचालक सूरज बेडगे, अमेय जाधव, किरण कांबळे, रिपाई (आठवले) राज्य सचिव मंगलराव माळगे, कवाडे गटाचे विद्याधर कांबळे, मोहन वाईंगडे, विलासराव खानविलकर (रेंदाळ), सरपंच दादासाहेब मोरे ( इंगळी), राजु मगदूम ( माणगाव), शिवाजी पाटील ( साजणी), संगिता नरदे (रांगोळी), प्रकाश जाधव, बाळासाहेब रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.