कोल्हापूर (प्रतिनिधी) : 12 डिसेंबर 1950 रोजी एक बहुभाषिक अभिनेता, मनोरंजन व्यवसायातील व्यक्ती, तमिऴ चित्रपट अभिनेते रजनिकांत यांचा जन्म झाला. त्यांनी आत्तापर्यंत तमिऴ चित्रपटात काम केले असले तरी त्यांनी हिंदी, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांतही आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रजनिकांत यांची मातृभाषा मराठी असली तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत अद्यापपर्यंत काम केलेले नाही.

रजनीकांत ह्यांचा जन्म बंगळूर येथे एका महाराष्ट्रीय मराठा हेन्द्रे पाटील यांच्या कुटुंबात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव गायकवाड आणि आईचे नाव जिजाबाई गायकवाड असे आहे. गायकवाड कुटुंबियांच्या चार अपत्यांपैकी रजनीकांत सर्वात धाकटे आहेत. त्यांचे मूळ गांव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मावळे कडेपठार आहे असे सांगितले जाते. तसेच जेजुरीचा खंडेराय त्यांचे कुलदैवत असल्याचे मध्यंतरी रजनीकांत ह्यांनी सकाळ ह्या वृत्तपत्रास दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते.

२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शिवाजी द बॉस’ या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुकमध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

शाळेत असतांना दारिद्र्यामुळे त्यांना खूप कठिण परिस्थितीत दिवस काढावे लागले. बंगळूर येथील आचार्य पाठशाळा ह्या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले आणि रामकृष्ण मिशनच्या बंगळूरमधील महाविद्यालयात त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण झाले.१९६८-१९७३ दरम्यान रजनीकांत मद्रास आणि बंगळूर मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळी कामे केली.

त्यानंतर ते बंगळूर बस ट्रान्स्पोर्ट सर्व्हिस मध्ये कंडक्टर (वाहक) म्हणून नियुक्त झाले. नंतर चित्रपटात काम करण्याच्या इच्छेमुळे एका मित्राच्या मदतीने ते चेन्नैला चित्रपटातील अभिनय शिकण्याकरता गेले. मद्रास फिल्म इंस्टीट्यूटमध्ये अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकिर्द १९७४-७५ मध्ये सुरू केली.


रजनीकांत यांनी वेळोवेळी तामीळ लोकांकरिता आणि लोकाधिकारांकरिता उपोषणे केली आहेत. शासनावर दबाव टाकण्याकरिता त्यांनी नेहमीच समाजघटकांची मदत केली आहे. रजनीकांत त्यांच्या दानशूर स्वभावाकरिताही ओळखले जातात.