सांगली : विशाल पाटलांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून  उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू. विशाल पाटलांनी पक्षशिस्त मोडली तर त्यांच्यावर पक्षशिस्त भंगाची कारवाई करू,असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. आम्ही अजूनही विशाल पाटलांना समजावत आहोत. यामध्ये आम्हाला यश मिळेल असं वाटत,असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु असून लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा अवघ्या काही तासांवर आलाय. तरीही  महाविकास आघाडीमधील धुसफूस अद्याप चालू आहे. मविआत सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या उबाठा गटाकडे असला तरी  काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी या जागेवरील त्यांचा दावा सोडलेला नाही. विशाल पाटील यांनी सोमवारी (१५ एप्रिल) काँग्रेस आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे या मतदारसंघात चंद्रहार पाटलांची कोंडी झाली आहे.

आता काँग्रेसने विशाल पाटलांना कारवाईचा इशारा दिला आहे. विशाल पाटलांनी दोन दिवसांपूर्वी सांगलीत शक्तिप्रदर्शन केलं. यानंतर ते म्हणाले की, “महाविकास आघाडीने मोठी चूक केली आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी एक सक्षम उमेदवार देणं आवश्यक होतं. परंतु, तसं झालेलं नाही. म्हणूनच मी उमेदवारी अर्ज भरून पक्षाकडे मागणी करावी, अशा पद्धतीचा निर्णय मतदारसंघातील लोकांनीच घेतला आहे. काँग्रेस पक्षाच्या ३८ हजार कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आम्ही काही निर्णय घेतले आहेत. याचाच एक भाग म्हणून मी सोमवारी (१५ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

विशाल पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा विश्वास ठाकरे गटानेही व्यक्त केला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत मविआचं जागावाटप पूर्ण झालं आहे. त्यात आता बदल होणार नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील हे शेतकरी संघटनेच्या तिकीटावर लढले होते. तेव्हा त्यांना काँग्रेसने तिकीट दिलं नव्हतं. त्यामुळे यंदा ते पुन्हा एकदा तसाच प्रयत्न करतायत. मात्र काँग्रेस नेतृत्व योग्य ती पावलं उचलेल आणि अर्ज मागे घेण्याची वेळ येईल किंवा त्याची अंतिम तारीख असेल तेव्हा विशाल पाटील तो अर्ज मागे घेतील, तसेच चंद्रहार पाटलांच्या पाठिशी उभे राहतील.