कोल्हापूर (प्रतिनिधी) : अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वच आघाड्यांवर आलेले अपयश लपविण्यासाठी आकांडतांडव केला. त्याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर फोडण्याचा ठाकरे पितापुत्रांचा प्रयत्न आहे. हा महाराष्ट्रातील गुंतवणूक रोखण्याचा आणि नव्या गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्राविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आज भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

खा. महाडिक म्हणाले की, वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचे ठाकरे सरकारचे अपयश उघडकीस येऊ नये. यासाठी उलटा कांगावा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा पुरता फसल्यानंतर आता महाराष्ट्राशी कोणताच संबंध नसलेल्या उद्योगांची खोटी यादी पुढे करून जनतेच्या मनात संशय निर्माण करण्याचे उद्योग ठाकरे पितापुत्रांनी सुरू केले आहेत. प्रत्यक्षात ज्या उद्योगांशी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरे यांनी साधी चर्चादेखील केली नव्हती, सामंजस्य करारही झाला नव्हता, किंवा सरकारमार्फत कोणताही पत्रव्यवहारदेखील झाला नव्हता, अशा उद्योगांची खोटी यादी पुढे करून एक अपप्रचाराचे टुलकिट तयार करण्याचा या पितापुत्रांचा प्रयत्न महाराष्ट्राच्या भविष्यातील प्रगतीस आणि उद्योगस्नेही वातावरणास अडसर निर्माण करणारा असल्याचा आरोप खासदार महाडिक यांनी केला.

तसेच अविश्वासाने आणि जनादेश लाथाडून अभद्र आघाडीद्वारे गैरमार्गाने मिळविलेली सत्ता अडीच वर्षांत गमावल्याच्या संतापातून ठाकरे पितापुत्रांचा हा थयथयाट सुरू केला आहे. याचा सूड महाराष्ट्रावर उगवण्यासाठी राज्यातील गुंतवणुकीत अडसर उभे करण्याचा भयंकर कट रचला जात आहे. कोविड काळात ठाकरे सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे अनेक नमुने जनतेने प्रत्यक्ष अनुभवले आहेत. कायदा गुंडाळून ठेवत जनतेला वार्‍यावर सोडणार्‍या आघाडी सरकारने अडीच वर्षांच्या सत्ताकाळात महाराष्ट्राला दहावर्षे मागे नेऊन काँग्रेसी राजवटीत नेले. मात्र, आता अशा कटकारस्थानांना केराची टोपली दाखवून राज्याला वेठीस धरणार्‍यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

ठाकरे सरकारशी संबंधित असलेल्यांच्या भ्रष्टाचाराचे भयंकर नमुने आता उजेडात येऊ लागले आहेत. भ्रष्टाचाराच्या आणि देशद्रोह्यांना सहाय्य केल्याच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा नेत्यांना खावी लागली. पावलावर पाऊल टाकून आणखी काही बोलभांड नेत्यांना गजाआड जाण्याच्या भीतीने घाम फुटला असून त्या भीतीपोटीच हे आकांडतांडव सुरू असल्याचा टोलाही खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला.