पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने मागील ४५ वर्षातील ऊस गाळपाचे सर्व विक्रम मोडीत काढत अवघ्या २६ दिवसात २ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून कारखान्याच्या इतिहासामध्ये नवा विक्रम केला आहे. शिवाय २० वर्षांनंतर कारखाना पहिल्यांदाच पूर्णक्षमतेने चालवण्यात कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व त्यांच्या संचालक मंडळांना यश आले आहे.

मागील दोन वर्षापूर्वी चुकीच्या व्यवस्थापनामुळे कारखाना बंद होता. दरम्यान, कारखान्याच्या निवडणुकीत साखर उद्योगाचा अनुभव असलेल्या अभिजित पाटील यांच्याकडे कारखान्याची सत्ता आली. त्यानंतर श्री. पाटील यांनी बंद पडलेला हा कारखाना अल्पावधीतच सुरू केला. शिवाय शेतकरी आणि कामगारांची थकीत देणी देवून त्यांचाही विश्वास संपादन केला. गत वर्षीच्या हंगामात तब्बल सात लाख टन गाळप करून कारखान्याची गाडी रुळावर आणली.

यावर्षी उसाचे क्षेत्र कमी असल्याने जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे सर्वच कारखान्यांसमोर आव्हान असतानाही अभिजित पाटील यांनी १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवून नेटके नियोजन केले आहे. एक नोव्हेंबर रोजी कारखाना सुरू झाला. अवघ्या २६ दिवसात कारखान्याने मागील सर्व उसाचे गाळप विक्रम मोडीत काढून २ लाख टन उसाचे गाळप केले आहे. तर २ लाख ६० हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.