पुणे (प्रतिनिधी) : प्रतापगडाच्या पायथ्याला असणारे अतिक्रमण हटवले, त्याप्रमाणे सरकारने महाराष्ट्रातील अन्य गड-किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून अतिक्रमणमुक्त करावे आणि या सर्व गड-किल्ल्यांना पूर्वीचे गतवैभव प्राप्त करुन द्यावे, अशी मागणी माजी आमदार आणि ‘शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलना’चे निमंत्रक नितीन शिंदे यांनी केली. ते हिंदू जनजागृती समिती आयोजित ‘प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त’ अन्य किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामांचे काय?’ या विषयावर आयोजित संवादात बोलत होते.

ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे म्हणाले की, अफजलखानाने अनेक मंदिराचा विध्वंस केला याच अफजलखानाच्या कबरीचे अनधिकृत बांधकाम प्रतापगडाच्या पायथ्याशी करून त्याचे उद्दात्तीकरण करण्यात आले. उच्च न्यायालयाने त्यावेळी अनधिकृत बांधकाम काढण्याचे आदेश तत्कालीन राज्य सरकारला दिले असतानाही त्याची अंमलबजावणी होत नव्हती. शेवटी विद्यमान सरकारने हे अनधिकृत बांधकाम तोडले, ही शिवभक्तांना आनंद देणारी गोष्ट आहे. वाई (सातारा) येथील प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.

हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट म्हणाले, महाराष्ट्रातील किमान २० ते २२ महत्त्वाच्या गड-किल्ल्यांवर अतिक्रमणे झाली असून, याविषयी वन विभाग, राज्य आणि केंद्रीय पुरातत्त्व विभाग या सर्वांना माहिती असून, ते या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करत आहेत. वन विभाग, पुरातत्त्व विभाग यांच्यासह महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवावीत, अशी समस्त हिंदू संघटनांची मागणी आहे. प्रत्येक गड-किल्ल्याचे संवर्धन करून तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची स्मारके उभारली पाहिजेत, यासंदर्भात शिंदे-फडणवीस सरकारने लक्ष घातले पाहिजे.