इचलकरंजी (प्रतिनिधी) : कोणत्याही गावाला शेती आणि पिण्यासाठी पाण्याची कमतरता न भासता इचलकरंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा केला जाईल. त्याचबरोबर यंत्रमागधारकांना वीजेच्या सवलतीसाठी घातलेली ऑनलाईन नोंदणीची अट आचारसंहिता संपताच रद्द केली जाईल, तसेच महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजी येथे केले. इचलकरंजी शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्री शिवतीर्थ येथून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, धैर्यशील माने आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

तर रॅलीत शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, अशोक स्वामी, सौ. मौश्मी आवाडे, विठ्ठल चोपडे आदींसह महायुती व घटक पक्षातील मान्यवर सहभागी झाले होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच इचलकरंजीत येत असल्याने त्यांचे शिवसेनेच्या वतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले.

शिवतीर्थ येथून पदयात्रेचा प्रचंड समुदायाच्या साक्षीने शुभारंभ करण्यात आला. कॉ. मलाबादे चौक ते महात्मा गांधी पुतळा येथे आल्यानंतर पदयात्रेचे रुपांतर सभेत झाले. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी, 27 एचपी खालील व 27 एचपी वरील यंत्रमागधारकांना वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणी अट रद्द करण्यासह इचलकरंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी योजनेचा शुभारंभ आचारसंहितेनंतर करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासह धैर्यशील माने यांना दुसर्‍यांदा खासदार करण्यासाठी साथ द्यावी असे आवाहन केले.

धैर्यशील माने यांनी, आज प्रचार सांगताच्या निमित्ताने लोटलेला जनसागर पाहता माझा विजय निश्‍चित आहे. मागील पाच वर्षात मी मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलो. परंतु सुरुवातीची अडीच वर्षे कोरोना महामारीच्या संकटातच गेली. त्यातून मी मतदारसंघासाठी 8200 कोटी रुपयांचा निधी आणला. इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्‍नात काही मंडळी राजकारण आणत आहेत. मात्र मी राजकारण न करता पाणी योजनेसाठी 168 कोटीचा निधी आणून दिला आहे. आणि ही योजना पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटीबध्द आहे.

त्याचबरोबर यंत्रमागधारकांच्या वीज सवलीतीमधील अडचण आचारसंहितेनंतर निश्‍चितपणे सोडविली जाईल. गत निवडणूकीत इचलकरंजीकरांनी मला 75 हजारांचे मताधिक्य दिले होते. तर यंदा ते लाखापेक्षा अधिक असेल, असा विश्‍वास व्यक्त केला.