लंडन : पीएनबी घोटाळ्यात फरार आरोपी नीरव मोदीला मोठा झटका बसला असून, नीरव मोदीचा भारतात प्रत्यार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्यार्पण थांबवण्याची याचिका यूके हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते.

ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने त्यासाठी मान्यता दिली आहे. यावेळी नीरव मोदीचे प्रत्यार्पण कोणत्याही प्रकारे अन्यायकारक किंवा जाचक ठरणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. फेब्रुवारीमध्ये नीरव मोदीला ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने भारताच्या ताब्यात देण्याची परवानगी दिली होती. या प्रकरणी नीरव मोदीने भारतात प्रत्यार्पणाविरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते. नीरवच्या याचिकेला उत्तर देताना लंडन हायकोर्टाने सांगितले की, भारत हा मित्र देश आहे आणि ब्रिटनचा भारत सरकारवर पूर्ण विश्वास आहे.

भारतात आणल्यानंतर नीरवला आर्थर रोड जेलच्या बॅरेक क्रमांक १२ मध्ये ठेवण्यात येणार आहे. ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने त्यांना सांगितले आहे की, भारताने त्यांना पुरेशी वैद्यकीय सेवा देण्याचे आश्वासन दिले आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेची १४५०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. नीरवच्या वकिलांनी या आधी न्यायालयात असा दावा केला होता की, भारतात पाठवल्यास त्याचे नैराश्य आणखी वाढेल. त्यामुळे ते आत्महत्या करु शकतात.