इचलकरंजी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात जास्त लोकसंख्याने असणारी कबनूर ग्रामपंचायत याची मूलभूत गरजा, विकास कामे पूर्ण होत नाहीत. त्यामुळे कबनूरचा हद्दीचा समावेश करून नियोजित इचलकरंजी महापालिकेत करा. अन्यथा स्वतंत्र नगरपालिका करा, अशा मागणीचे निवेदन कबनूरच्या ग्रामस्थांनी प्रांताधिकारी कार्यालयात दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कबनूर गावची लोकसंख्या ५० हजारांवर असून ग्रामपंचायत असल्याने मूलभूत गरजा पूर्ण होत नाही. त्यामुळे कोट्यवधींची घरफाळा, पाणीपट्टी थकीत आहे. याचा परिणाम नागरी सुविधांवर होत आहे.त्यामुळे कबनूरचा समावेश इचलकरंजी पालिकेत करावा अथवा स्वतंत्र नगरपालिका व्हावी, असा ग्रामसभेत वेळोवेळी ठरावही करण्यात आला आहे. मात्र, स्थानिक आणि प्रस्थापित नेत्यांच्या राजकीय हितसंबंध धोक्यात येत असल्याने केवळ त्यांच्या विरोधामुळे हा निर्णय होत नाही. परिणामी नागरिकांत सुप्त उद्रेक दाटत असून शांतता व सुव्यवस्था धोक्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर अशोक कांबळे, सुधाकर कुलकर्णी, शांतीनाथ कामत, निलेश पाटील, बी. जी. देशमुख, दत्ता पाटील, अपेक्षा कांबळे, अजित खुडे, राहुल कांबळे, सुनील इंगवले आदींच्या सह्या आहेत.