मुंबई (प्रतिनिधी) : नवी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यातच भाजप नेत्यांनी कृषी कायद्यांवरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरच टीका सुरू केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक संतापले. शेतकरी आंदोलनात पंजाबचेच नाही तर इतर राज्याचेही शेतकरी आहेत, असे सांगतानाच आंदोलनातील शेतकरी हिंदू नाहीत का? असा संतप्त सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले गेले. ट्रॅक्टर आंदोलनात घुसून भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोनल चिघळवण्याचा प्रयत्न केला. आता भाजप धर्माचा आधार घेऊन आंदोलन करत असून हे चुकीचे आहे. दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी हिंदू नाहीत का? असा सवालही त्यांनी केला.

बजेटमध्ये दीडपट हमी भाव देण्याची मागणी करण्यात आली. शेतकरी हमी भावाची मागणी करत आहेत. तुम्ही त्यांना लेखी का लिहून देत नाही, असं सांगतानाच दिल्लीतील आंदोलनात केवळ पंजाबचेच शेतकरी नाहीत, तर इतर राज्यांचेही शेतकरी आहेत. त्यामुळे केवळ हे आंदोलन पंजाब-हरियाणा पुरते मर्यादित असल्याचे चित्रं उभे करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.