कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने सिगारेट व तंबाखू उत्पादनाबाबत केलेला नवीन प्रस्तावित कायदा रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनच्या वतीने जिल्हा अध्यक्ष अरुण सावंत यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिला.

केंद्र सरकारचा सिगारेट व तंबाखू उत्पादन विक्रीचा २००३ चा ‘कोप्टा’ कायदाच मोठा कठोर असताना त्यामध्ये बदल करून पानपट्टी धारकांसाठी अन्यायकारक आणि जाचक असा नवीन प्रस्तावित कायदा येत आहे. या नवीन प्रस्तावित कायद्याचे उल्लंघन झाल्यास पानपट्टी धारकांना आर्थिक दंडाची आणि मोठ्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पानपट्टीधारक रस्त्यावर येतील. त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पत्रकार परिषदेला जिल्हा उपाध्यक्ष प्रविण राजोपाध्ये, शहर अध्यक्ष उमेश ठोंबरे, उपाध्यक्ष राजेश बाभूळकर, मधुकर राबाडे, तानाजी कोतमिरे, संजय सराटे, रविंद्र यादव, रविंद्र शिंदे यांच्यासह कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.