कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर येथील रेणुका मंदिरातील आंबील यात्रा रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

कोल्हापुरातील रेणुका मंदिरात प्रत्येक वर्षी आंबील यात्रेचे आयोजन करण्यात येते. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका यात्रा पार पडल्यानंतर पुढील ८-१० दिवसांत ही यात्रा होत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बेळगाव जिल्हा प्रशासनाने सौंदत्तीमधील रेणुका मंदिरातील यात्रा रद्द केली आहे. त्यानंतर कोल्हापुरातील मंदिरातीलही आंबील यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने केला आहे. यात्रेला मोठ्या संख्येने भाविक आल्यास कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून यात्रा आयोजित करू नये, अशा सूचना आयोजकांना देण्यात आल्या आहेत.