बारामती : भाजपने आधी ठाण्याचा नवरा केला, त्यानंतर नांदेडचा नवरा केला, आता बारामतीचा ही नवरा केला. मात्र, तरीही भाजपला विकास जन्माला घालता आला नाही अशी टीका  उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अजित पवार बारामतीचा विकास केला असल्याचा दावा करत आहेत. मात्र, शरद पवार यांनी  बारामतीत सर्व निर्माण केले. त्यांनी सर्व निर्माण केले नसते तर तुम्ही आजही राजदूत मोटर सायकल वरून दूध विकत बसला असता, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.

यावेळी राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकास्त्र सोडलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका महिन्यामध्ये 27 वेळा महाराष्ट्रात आले आहेत. कारण त्यांना महाराष्ट्राची भीती वाटत आहे. महाराष्ट्र दिल्ली उठवून टाकेल, अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.महाराष्ट्रातील पक्ष फोडायचे आणि लुट गुजरात न्यायची, हा उद्योग नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सुरू केला असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मी शिवसेना फडणवीस गट म्हणतो. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीस गट म्हणतो. त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील दोन पक्ष सोडले. मात्र, त्यामुळे काय वाकड झाले? असा प्रतिप्रश्न यावेळी त्यांनी  उपस्थित केला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे अस्तित्व आजही कायम असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.