सावरवाडी (प्रतिनिधी) : राज्यसभेत बहुमत नसताना मुठभर बहुराष्ट्रीय कंपन्याच्या हितासाठी भाजपाने नवीन कृषी कायदे मंजूर केले. हे कायदे देशातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे असल्याची टिका महाराष्ट्र राज्य किसान सभेचे महासचिव नामदेवराव गावडे यांनी केली. ते करवीर तालुक्यातील हसुर दुमाला येथे किसान संघर्ष यात्रेच्या सभेत बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच तुकाराम पाटील होते.
गावडे म्हणाले की, केंद्र शासनाने केलेले तीन कायदे हे अन्यायकारक आहेत. नवी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिबा वाढत आहे. गावांपासून ते संसदेपर्यत या आंदोलनाची धार वाढली पाहिजे असल्याचे सांगितले. शेकाप नेते बाबासाहेब देवकर म्हणाले, देशातील चारशे शेतकरी संघटना एकत्रीत येऊन मोठे आंदोलन उभारले आहे. भांडवलदारांचे हस्तक बनलेल्या पंतप्रधान मोदी यांनी तीन कायदे करून शेतकऱ्यांना उद्वस्त करण्याचा घाट घातला आहे. तसेच ग्रामीण शेतकऱ्यांनी लढ्यात उतरणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा मार्केट कमिटीचे उपसभापती अमित कांबळे, भाऊसाहेब खराडे, भोगावती साखर कारखान्याचे संचालक प्रा. सुनिल खराडे, प्रकाश पाटील, तुकाराम पाटील, तुकाराम खराडे, नामदेव पाटील, एस. एस. पाटील, एन. वाय. पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.