नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने आज (मंगळवार) अनलॉक – ५ ची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवल्याची घोषणा केली. त्यामुळे सध्या जी काही बंधने आहेत तीच पुढील महिनाभर कायम राहणार आहेत. कोरोनाची साथ संपलेली नाही त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात कडक लॉकडाऊन सुरूच असेल असही केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. अनलॉकच्या प्रक्रियेनुसार जवळपास अनेक बंधनेही वगळण्यात आली असून काही बंधनेच कायम ठेवण्यात आली आहेत असंही केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.

नागरिकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं आवाहनही सरकारने केलं आहे. काही दिवसांपासून देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली, तरी धोका टळलेला नाही असंही सरकारने म्हटलं आहे. काही राज्यांमध्ये मंदिरं खुली करण्यात आली आहेत. त्याचबरोबर शाळा सुरू करण्यासही परवानगी दिली आहे. मात्र महाराष्ट्रात सरकारने मंदिरं सुरू करण्याला अजुनही परवानगी दिलेली नाही. प्रवास आणि इतर गोष्टींसाठी आता कुठलीही बंधन नाहीत. मात्र आता कोरोना साथीची तीव्रता कमी होऊ लागली आहे. २२ मार्चपासून पहिल्यांदाच देशाचा मृत्यूदर निच्चांकी पातळीवर आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.