सांगली (प्रतिनिधी) : लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यातील खरसुंडीत बैल बाजार भरला आहे. येथे बैल खरेदी करण्यासाठी पशूपालकांची झुंबड उडाली आहे. विशेष म्हणजे या बाजारात जातीवंत बैल विक्रीसाठी आले असून त्याला मोठी किंमतही लागली आहे. एका खिलार बैलाला इनोव्हा एवढी किंमत आल्याने सध्या खुरसुंडीचा खिल्लार जनावर बाजार चर्चेत आला आहे.

यात्रेमध्ये १६ लाख रुपये किमतीचा बैल आकर्षणाचा विषय ठरला आहे. या बैलाची किंमत इनोव्हा एवढी असल्याने हा बैल सध्या बाजारातील सर्वात आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. यात्रेमध्ये कोट्यवधींची उलाढाल होत आहे. मार्केट कमिटी आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने लाईट आणि पाण्याची सोय करण्यात आलेली आहे.

सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथे भरणारी पौष यात्रा ही महाराष्ट्रामध्ये जातिवंत आणि नामवंत खिल्लार बैलांसाठी प्रसिद्ध आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभर सर्व यात्रा बंद होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांची खरेदी-विक्री होत नव्हती. मात्र आता सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून खरसुंडीतील बैलबाजार भरवण्यात आलेला आहे. या बाजारात सुमारे ६ ते ७ कोटींची उलाढाल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.