कोल्हापूर (प्रतिनिधी) : जनसंघर्ष सेनेच्या वतीने अन्यायी इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातीची चूल आणि शेणी पाठवण्यात आली. शनिवार पेठ पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांकडे या वस्तू सुपूर्द करण्यात आल्या.

आंतरराष्ट्रीय पातळीवर गॅसचे दर स्थिर असताना केंद्र सरकारने केलेली दरवाढ ही अन्यायी आहे. लॉकडाऊन, कोवीड निर्बंधांमुळे जगण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच सरकारने केलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सणासुदीच्या तोंडावर महागाईला फोडणी दिल्याने आठ महिन्यात तब्बल २८ टक्के दरवाढ झालेली आहे. उज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शन मोफत दिल्याची जाहिरात करणाऱ्या केंद्र सरकारने येत्या काही दिवसात ही अन्यायी दरवाढ रद्द न केल्यास पेट्रोल पंपावरील फलक फाडण्यात येतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

जनसंघर्ष सेना जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी, लहुजी शिंदे, सतीश कदम, अनिकेत मस्कर, सुनील थोरवत, प्रथमेश पोवार, प्रणव नागवेकर, विराज पाटील, गौरव पाटील आदी उपस्थित होते.