सेनापती कापशी  (प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने १६ ते ३०  नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्याची एकरक्कमी एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. अशी माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाटगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. तसेच कारखान्याने एक नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर कालावधीतील तोडणी-वाहतूक बिलेही खात्यांवर जमा केली असल्याचे सांगितले.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात गाळप झालेल्या ८९, ४६७ ऊसाची प्रतिटन २,९६० रुपयेप्रमाणे ऊसबिल रक्कम २६ कोटी ४८ लाख २२ हजार ३२० रुपये एवढी होते. त्यापैकी चार कोटी १३ लाख ४३ हजार २०० रुपयांची रक्कम विकास सोसायट्यांच्या कर्ज खात्यावर वर्ग केली आहे. २२ कोटी ३४ लाख ७९ हजार १२० रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा केली आहे.

कारखान्यांने आजअखेर साडेतीन लाख टन ऊसगाळप झाले आहे. सहवीज प्रकल्पामध्ये तयार झालेली वीज महावितरणला निर्यात केली आहे. कारखान्याने या हंगामात एक कोटी लिटर इथेनॉल विक्रीचे करार केले आहेत. गळीत हंगामात ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवलेला आहे.  त्यांनी आपापल्या संबंधित बँकांमध्ये व सोसायट्यामध्ये १४ डिसेंबरपासून ऊस बिलाच्या रक्कम आणि पावत्या घेऊन जाव्यात. तसेच शेतकऱ्यांनी पिकविलेला सर्वच्या सर्व ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही संजय घाटगे यांनी केले आहे.