कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यात त्वरित गोसंवर्धन आयोग स्थापन करावी या मागणीचे निवेदन गो संवर्ध महासंघ आणि विविध गोप्रेमी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी स्वीकारले.

देशाचा अन्नदाता शेतकरी शेती उत्पादन खर्च वाढत असल्याने आर्थिक अडचणीत आहेत. तसेच तो आत्महत्या करत आहे. वास्तविक कृषीप्रधान भारत देशाची गेली हजारो वर्षे शेती, चिकित्सा आणि पर्यावरण याचे समतोल राखण्याचे रसायन भारतीय देशी गो वंशात आहे. गाय ही भारतीय अर्थ व्यवस्था आणि राष्ट्रीय एकात्मता यांचे प्रतिक आहे. शेतकरी कुटुंबाची आर्थिक समृद्धी करण्यासाठी, तसेच ग्रामीण अर्थक्रांतीसाठी देशी गाय संवर्धन ही काळाजी गरज आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

हे निवेदन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांतप्रमुख (गो सेवा समिती) शेखर धर्माधिकारी आणि ज्येष्ठ स्वयंसेवक श्रीकांत कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. या प्रसंगी गो सेवा समितीचे विठ्ठल मुरकेवार, अनिल जरग, अशोक पोतनीस, कपिल उमराणीकर, संजय चव्हाण, गो संवर्धन महासंघाचे अध्यक्ष विजय वरुडकर, आत्मसाहाय्य सामाजिक संस्थेच्या दिप्ती कदम, ‘सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’च्या सारिका नरवाडे, अमृता जगताप, अल्का लुंगारे उपस्थित होत्या.