लातूर (प्रतिनिधी) : लातुरच्या उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज (रविवार) उदगीर येथे महामंडळाची बैठक झाली. यावेळी अध्यक्षपदासाठी सासणे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले.    

सासणे यांच्यासोबतच अनिल अवचट, अच्युत गोडबोले, डॉ. रामचंद्र देखणे यांचीही नावे चर्चेत होती. मुंबईच्या संस्थेने भारत सासणे व प्रवीण दवणे यांची नावे सुचविली होती. तर, छत्तीसगडच्या संस्थेने अनिल अवचट यांचे नाव समोर केले होते.

तर पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून भारत सासणे यांच्यासोबतच अनिल अवचट, अच्युत गोडबोले, डॉ. रामचंद्र देखणे यांचीही नावे दिली होती. दरम्यान,  याआधी तीन संमेलनाध्यक्ष निवडताना महाराष्ट्र साहित्य परिषदेने जी नावे सुचवली होती. त्यावरच अंतिम निर्णय घेतला होता. आताही सासणे यांची निवड झाल्याने महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.