मुंबई : सोलापूरमधील सभेत पंतप्रधान मोदींवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला नकली म्हणाल्याचा मुद्दा उपस्थित करत ‘नकली म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का?’ असा टोला लगावला होता. तर देवेंद्र फडणवीस यांनी मोदींनी लस दिल्याने आपण जिवंत असल्याचं विधान केलं होतं त्यावरुनही उद्धव ठाकरेंनी टोला लगावताना ‘मोदींनी लस बनवली मग संशोधक काय गवत उपटत होते का?’ असं म्हटलं होतं. यावरुनच बावनकुळेंनी संताप व्यक्त केला आहे.”महाराष्ट्राचे महानालायक उद्धव ठाकरे असा उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर निशाना साधला आहे. उद्धव ठाकरे यांचा आदरणीय मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल बोलताना आज पुन्हा तोल गेलाच,” असं म्हणत बावनकुळे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

बावनकुळेंनी रामदास स्वामींच्या एका ओवीचा संदर्भ देत पोस्ट लिहिली आहे. “खरं तर समर्थ रामदास स्वामींनी मुर्खांची लक्षणं सांगतांना लिहून ठेवलंय. तोंडाळासीं भांडों नये | वाचाळासीं तंडोंनये | संतसंग खंडूं नये | अंतर्यामी” असं बावनकुळेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. “उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या नावानं कितीही शिव्याशाप दिले तरी जनता जनार्दनाचे आशीर्वाद देवेंद्र फडणवीसांसोबत आहेत,” असं बावनकुळेंनी म्हटलं आहे. “उद्धव ठाकरे यांनी आता एक लक्षात ठेवावं की, तुम्ही मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल कितीही वायफळ बडबड करा. 4 जून रोजी जनता तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही,” असा इशाराही बावनकुळेंनी पोस्टच्या शेवटी दिला आहे. बावनकुळे यांनी केलेल्या या टीकेला आता ठाकरे गटाकडून काय उत्तर मिळणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.