कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना कथित मद्य घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप करून ईडीने अटक केली होती. गेले दिड महिने ते तिहार जेलमध्ये होते. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एका विरोधी पक्षाच्या नेत्याला अटक झाल्याने देशभरातून यावर प्रतिक्रिया उमटत होत्या. अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामिन मंजूर केल्यामुळे कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आपने साखर वाटप केले.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालांना अंतरीम जामीन मंजूर करून त्यांना दिलासा दिला. या निर्णयाचे स्वागत करत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी छ. शिवाजी चौक येथे साखर वाटप केले.

ईडीने पीएमएलए (हवाला प्रतिबंधक कायदा) चा गैरवापर करत केजरीवालांना अटक केली होती. या कायद्यानुसार अटक झालेल्या व्यक्तीला सहज जामीन मिळत नाही. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने अवघ्या पन्नास दिवसात जामीन देऊन केजरीवालांना दिलासा दिला. लोकशाही धोक्यात येत असताना न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी स्वागतार्ह आहे.

देशात इंडिया आघाडीचा विजय होणार असून, लवकरच केजरीवालांना या खोट्या आरोपांमधून निर्दोष सुटतील असा विश्वास आपचे प्रदेश संघटन सचिव संदिप देसाई यांनी व्यक्त केला.

यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, समीर लतीफ, डॉ. कुमाजी पाटील, स्मिता चौगुले, रमेश कोळी, संजय नलवडे, रणजित पाटील, उमेश वडर, आनंदराव चौगुले, प्राजक्ता डाफळे, राम भोसले, शशांक लोखंडे, सचिन पाटील, आनंदराव वणिरे, मनोहर नाटकर, सफवान काझी, स्वप्नील काळे, आनंदराव वाणिर, शकील मोमीन आदी उपस्थित होते.