मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खान आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि ट्विटवरुन नेहमीच चर्चेत असतो. केआरकेला वादग्रस्त ट्विट करणे महागात पडले आहे. याप्रकरणी मुंबईच्या मालाड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. केआरकेविरोधात मालाड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर मालाड पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली आहे.

दोन वर्षांपूर्वी केलेल्या एका वादग्रस्त ट्विट प्रकरणी केआरके मोठ्या अडचणीत सापडला आहे. केआरकेला मुंबई एअरपोर्टवर दाखल होताच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर मालाड पोलिसांनी चौकशी करुन त्याला अटक केली आहे. या वादग्रस्त ट्वीट प्रकरणाचा तपास मालाड पोलिसांकडून सुरु आहे.

कमाल आर खान त्याच्या कोणत्याही ट्विटमुळे अडचणीत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे तो अनेकदा चर्चेत असतो. कमाल आर खान बॉलिवूडमधील सर्व बड्या स्टार्सना बिनधास्तपणे टार्गेट करत असतो. त्यांच्याविरोधात उघड उघडपणे वक्तव्य तो करत असतो. आपल्या ट्विटच्या माध्यमातून त्याने सलमान खानपासून ते शाहरुख खानपर्यंत बॉलिवूडच्या सुपरस्टार्सवर अनेक आरोप केलेत आणि त्यांना वाईट बोलला आहे.