कोल्हापूर (प्रतिनिधी) : तिसरी लाट येईल का ? आणि आली तर जिल्ह्यातील लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल. या विषयी सध्या अंदाज आहेत, पण आपण सावध असले पाहिजे. त्या दृष्टीने तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी हॉस्पीटल्सनी सज्ज रहावे. तसेच यासाठी लागणारा कृती आराखडा येत्या बुधवारपर्यंत तयार करावा असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी आढावा बैठकीत दिले.

पालकमंत्री म्हणाले की, या मुले आणि मुलींची संख्या शिक्षण विभागाच्या सहाय्याने निश्चित करण्यात यावी. आरोग्य विभागाने गाफील न राहता संभाव्य तिसऱ्या लाटेचे सूक्ष्म नियोजन करावे. आरोग्य विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार सुमारे 200 आयसीयु बेड लागतील. या करिता जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात अनुक्रमे 50 तर खाजगी रुग्णालयात 150 व्हेंटीलेटर बेड तालुकानिहाय निश्चित करण्यात येणार असून यामध्ये 10 ऑक्सीजन तर 2 व्हेंटीलेटर बेडचा समावेश असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी ज्या ठिकाणी कोव्हिड हॉस्पीटल्स आहेत त्या ठिकाणी लहान मुलांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावे तसेच त्यासाठी लागणारी अत्यावश्यक लागणारी वैद्यकीय उपकरणेही रुग्णालयांनी तयार ठेवावीत, तसेच आवश्यकतेनुसार खरेदी करावीत अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली.

तर सीपीआर रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. संगिता कुंभोजकर यांनी, जिल्ह्यातील केवळ 5 टक्के बालकांना ऑक्सीजन तर 1 ते 2 टक्के मुलांना व्हेटींलेटर लागण्याची शक्यता या बैठकीत व्यक्त केली.

यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलंडे,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगश साळी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक पोळ, जिल्ह्यातील बालरोग्य तज्ज्ञ व्हीसीव्दारे उपस्थित होते.