मंडणगड : मी नेतृत्व बदलले म्हणून माझ्यावर टिका करता पण अनंत गीते तुम्ही जनतेचा विश्वासघात केला आहात. रामदासभाई कदम, सुर्यकांत दळवी यांनी निवडणूकीला मदत केली त्यांचा विश्वासघात केलात. तर कुणबी समाजाचाही तुम्ही विश्वासघात केलात, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी मंडणगड येथील महायुतीच्या जाहीर सभेत केला.

कालबाह्य झालेल्या कायद्यात बदल होत असतात परंतु घटनेत बदल कधीच होणार नाही. पण जाणीवपूर्वक घटना बदलली जाणार आहे, अशी अफवा पसरवली जात आहे त्यातून नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा डाव आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही घटना कधीच बदलली जाणार नाही असा विश्वास सुनिल तटकरे यांनी जनतेला दिला.

एनडीए सरकार पुन्हा सत्तेत येणार यात शंका नाही. या सरकारच्या माध्यमातून नवनवीन कल्याणकारी योजना आणण्याचे काम करणार असल्याचे सांगतानाच केंद्रसरकारच्या माध्यमातून तुम्ही सुचवलेली प्रत्येक कामे पूर्ण करणार असल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मगाव आंबवडे आपल्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड आहे. अशा या पावनभूमीत आपल्याला विकासकामे तुम्हाला सांगता येणार नाही इतकी करायची आहेत. त्यामुळे कोकणाचे आणि या मतदारसंघाचे नंदनवन केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा शब्द सुनिल तटकरे यांनी यावेळी दिला.