पुणे (प्रतिनिधी) : ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले (वय ७४) यांचे पुण्यात निधन झाले. कथा, कादंबरी आणि समीक्षा अशा विविध अंगांनी त्यांनी मराठीत लेखन केले आहे. चिपळूण येथे २०१२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षं काम केले होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांना फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते; मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांचे निधन झाले.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये झाला होता. त्यांची अत्यंत खडतर परिस्थितीतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर देगलूर महाविद्यालयातून पदवी घेतली. नंतर एम. ए. ला मराठवाडा विद्यापीठातून केले. त्यांनी शंकर पाटील यांच्या साहित्यावर पीएचडी केली होती. पुढे त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात १९ वर्षे अध्यापनाचे काम केले. नंतर ते १९९६ ते २००६ या काळात विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रोफेसर आणि विभागप्रमुख होते. २००५ ते २०१० अशी पाच वर्षे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे कुलगुरु देखील होते.

व्यासंगी, अध्यापनकुशल, उपक्रमशील आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक आणि पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक या पदांवरून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था आणि साहित्य अकादमी या संस्थांच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष (१९८८-१९८९), महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि विविध विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळांचे ते सदस्य होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. श्रीगोंदा येथे १९९९ साली झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आणि २००५ साली जालना येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते.