मुंबई – लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला आहे. प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते एकमेकांवर टीकेचे तोफ डागत आहेत. अशातच सध्या देशात बड्या नेत्यांचा कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे. हे दोन बडे नेते दुसरे तिसरे कुणीही नसून माजी कृषिमंत्री आणि शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सुरु आहे. दोघेही एकमेंकांवर निशाणा साधण्याचा एक ही संधी सोडत नाहीयत. उद्धव ठाकरे यांच्यावर संकट आल्यास त्यांना मदत करणारा पहिला व्यक्ती मी असेन, या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेच्या काळात आपण त्यांची विचारपूस केली. मोदी या सगळ्याबद्दल लाख बोलतील. पण आमची प्रार्थना आहे की, उद्धव ठाकरे यांना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.ते शनिवारी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले शरद पवार ..?

शरद पवार म्हणाले , “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासन दिली, पण कृतीत आणली नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली जनतेसमोर अनेक गोष्टी मांडल्या. मनमोहन सिंग यांच्यावर टिका, टिप्पणी केली. पण आज तेच निर्णय राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांना हा विरोधाभास दिसतोय. लोकांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी आहे” असं शरद पवार म्हणाले. “पंतप्रधान मोदी त्यांच्या आणि मनमोहन सिंग यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळाची तुलना करतात. पण मनमोहन सिंग यांचं वैशिष्ट्य होतं, ते कुठलाही गाजावाजा न करता, शांतपणे काम करुन रिझल्ट द्यायचे. मोदींच्या रिझल्टबद्दल माहिती नाही, पण त्यांचा चर्चा, भाष्य, टिका टिप्पणी यामध्ये फार वेळ जातो. लोकांच्या लक्षात येतय हे काही खरं नाही” असं शरद पवार म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला महामुलाखत दिली. त्यात ते म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यामुळे फुटली नाही. नेतृत्व कोण करणार? यावरुन पवारांच्या घरातील भांडण आहे” ‘कुटुंब संभाळता आलं नाही, महाराष्ट्र काय संभाळणार?’ अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली. आज शरद पवारांनी या टीकेला उत्तर दिलं. “मोदींनी कुठे कुटुंब सांभाळलं? मी त्यावर जाऊ इच्छित नाही. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक आहे. पण आपण व्यक्तीगत बोलणार नाही” असं शरद पवार म्हणाले.

या महामुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, उद्धव ठाकरेंच्या आजारपणाच्या काळात त्यांची विचारपूस करायचो असं सांगितलं. “उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत. संकटकाळात त्यांना मदत करणार पहिला माणसू मी असेन” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यावर शरद पवार म्हणाले की, “त्यांनी लाख म्हटलं असेल, पण आमची प्रार्थना आहे की, उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये” असे ते म्हणाले.