कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर येथील जाधव कुटूंब सूर्यकांत जाधव, गौरी जाधव, युवराज जाधव, व प्रशांत चिले हे पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. पंढरपूरहून ते कोल्हापूरला कार क्रमांक (एम एच 09 जी एफ 8323) ने जात असताना अपघात झाला असून, या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण ता. कवठेमहांकाळ येथील उड्डाणपूलावर झाला असून, चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार दुभाजकावर जोरदाराने आदळली. यात तीन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

यामध्ये सूर्यकांत जाधव, गौरी जाधव, युवराज जाधव हे जागीच ठार झाले. तर प्रशांत चिले हे गंभीर जखमी झाले. जखमी चिले यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर करीत आहेत.