कोल्हापूर (प्रतिनिधी) : खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शनिवार दि. १२ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील दहा हजार कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये हिंगोली जिल्ह्यात सहभागी होणार असून, हे कार्यकर्ते हिंगोलीकडे रवाना झाले आहेत.

हिंगोलीमधील पदयात्रेबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या नियोजन बैठकीत कायदा सुव्यवस्था, पार्किंग, विविध विभागाकडून सर्व सेवा याबाबत चर्चा झाली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. सतेज पाटील, आ. वर्षा गायकवाड, आ. प्रज्ञा सातव, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान, भारत जोडो यात्रेत कोल्हापूर जिल्ह्यातून जवळपास दहा हजार कार्यकर्ते हिंगोलीला रवाना झाले आहेत. शनिवार दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सत्रात हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील लक्ष्मी फिलींग स्टेशन, शेवळागाव या मार्गावर हे कार्यकर्ते भारत जोडो पदयात्रेत सहभागी होणार आहेत. या सर्व कार्यकर्त्यांची सर्व व्यवस्था जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांनी ज्या ठिकाणी केली आहे, त्या हिंगोली येथील तिरूमला लॉन्स, मधुर विथ पॅलेस, साई रिसॉर्ट येथील विश्रांती, भोजनाची ठिकाणची पाहणी करून काही महत्त्वाच्या सूचना केल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या राहण्याच्या आणि जेवण्याच्या सर्व व्यवस्थेवर आमदार सतेज पाटील यांनी वैयक्तिक लक्ष घातले आहे. गोकुळचे संचालक बयाजी शेळके, सचिन चौगले, माँटी मगदूम, जे. के. पाटील, विनायक सूर्यवंशी, एस. के. शिंदे यांची टीम गेल्या १५ दिवस हिंगोली नियोजनात व्यस्त आहे. राहुल गांधी यांच्या पदयात्रेत सहभागी कोल्हापूरचे कार्यकर्ते भगवे फेटे, टी शर्ट घालून उत्साहात  सहभागी होणार आहेत. लेझीमपथक, ढोलताशा या पारंपरिक वाद्यासह मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, तसेच कुस्तीची प्रात्यक्षिके या पदयात्रा या मार्गावर दाखवण्यात येणार आहेत.