कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सव काळात अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या लाखो भाविकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली. नवरात्रोत्सव तयारी आणि प्रलंबित कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमार्फत विविध विकासकामे सुरु आहेत; परंतु ही कामे मुदतीत पूर्ण झालेली नाहीत. नवरात्रोत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये, कोणतीही तक्रार येऊ नये, याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात. देवस्थान समितीची प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावावीत आणि प्रस्तावित आराखड्यांच्या प्रती सादर कराव्यात. याबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून मंत्रालय स्तरावर बैठक लावू, अशी माहिती राजेश क्षीरसागर यांनी दिली.

राजेश क्षीरसागर यांनी, नवरात्रोत्सवात देवस्थान समितीच्या वतीने भाविकांसाठी पार्किंग, मंडप व्यवस्था, स्वच्छतागृह, मंदिर परिसरातील दुकानदारांच्या समस्या, सुरक्षा रक्षकांकडून भाविकांशी होणारे वाद, भाविकांच्या मालमत्तेची सुरक्षा, देवस्थान समिती अंतर्गत सुरु असलेली विकासकामे, त्यातील प्रलंबित कामे, प्रस्तावित विकासकामे आदीबाबत माहितीची विचारणा केली.

देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी सांगितले की, भाविकांच्या वाहनांसाठी सुमारे ११ ठिकाणी पार्किंग जागांचे नियोजन केले आहे. यासह गांधी मैदान, राजर्षी शाहू व छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे अतिरिक्त जागांची मागणी करण्यात आली आहे. पार्किंग ठिकाणीच भाविकांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून दिले जाणार आहे. मंदिर परिसरापासून दूर अंतरावर असणाऱ्या पार्किंगच्या ठिकाणाहून केएमटी बसेस उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी महापालिकेकडे केली आहे.

मंदिर परिसरातील कोणतेही रस्ते बंद करण्यात येणार नाहीत. मंदिर परिसरात १०० सीसीटीव्हीद्वारे लावून भाविकांच्या सुरक्षिततेवर करडी नजर ठेवली जाणार आहे. भाविकांसाठी मोफत दर्शनासह दररोज १००० पेड दर्शन पासची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या दिवसाच्या अनुभवावर दुसऱ्या दिवशीपासून पेड दर्शन पासची संख्या वाढविण्यात येणार आहे. सुरक्षा रक्षकांनी भाविकांशी गैरवर्तन केल्यास तत्काळ सेवेतून निलंबित करण्याचा सूचना दिल्या आहेत. कोविडमुळे रखडलेले जोतिबा मंदिर येथे दर्शन मंडप आणि स्वच्छतागृहाचे काम दिलेल्या वाढीव मुदतीत पूर्ण होईल, असे नायकवडे यांनी सांगितले.

अंबाबाई मंदिर परिसरातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची आवश्यकता आहे. अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास निधी यासह मंदिर परिसरात भाविकांना मूलभूत सोईसुविधा देण्याकरिता आवश्यक विकासकामांचे आराखडे नियोजन विभागाच्या माध्यमातून शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. अंबाबाई मंदिरातील दर्शन मंडपासाठी तीन जागांची चाचपणी सुरु आहे. यासह मंदिर परिसरातील व्यापारी वर्गाशीही चर्चा करून जागेचा विषय मार्गी लावण्याबाबत प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.

नवरात्रोत्सव काळात मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात पूर्वापार कार्यक्रम करणाऱ्या कलाकारांनाही सामावून घ्यावे, मंदिर परिसरात होणाऱ्या चोऱ्या, पाकीटमारी आदीबाबत रेकॉर्डवरील सराईत गुंडांना ताब्यात घेण्याबाबत पोलीस प्रशासनास सूचना कराव्यात, आगामी काळात काम रखडले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, देवस्थान समितीचे उपअभियंता सुयश पाटील, लेखापाल धैर्यशील तिवले, वास्तुविशारद राजेंद्र सावंत, मनोज पंडित, रणजित निकम, ठेकेदार संकल्प पाटील आदी उपस्थित होते.