मुंबई : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. संपूर्ण जगाचे लक्ष देशाच्या निवडणुकीकडे लागून राहिले आहे. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होत आहे. शुक्रवारी 26 एप्रिल रोजी देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांना पाडा असे आवाहन केले होते. तर महायुतीचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत. यावरही मनोज जरांगे-पाटील यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मी नाही. मराठा समाजाने आता ठरवायचे आहे. समाजाचा आता नाईलाज आहे. आम्ही कुणाला पाठिंबा दिलेला नाही. जो सगेसोयरे या विषयाच्या बाजूने आहे. त्यांचा विचार करा. जो सगे सोयरे विषयाच्या बाजूने नाही त्यांना असे पाडा की त्यांच्या दोन तीन पिढ्या पुन्हा वर येऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.

मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मोदी साहेबांना इकडे लक्ष देण्याची गरज नव्हती. मोदी साहेब शक्यतो स्वतःचं चिन्ह सोडून कधीच दुसऱ्याच्या प्रचाराला गेले नाहीत. मराठा समाजाच्या एकीची भीती निर्माण झाली आहे. इथच मराठा जिंकला की, त्यांना प्रत्येक टप्प्यात मोदी यांना आणावे लागतय. म्हणजे यांना मराठ्यांची प्रचंड भीती आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

काही जण सहानुभूती मिळवण्यासाठी कारस्थान करताय
सांगलीत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला अज्ञाताकडून चपलांचा हार घालण्यात आला आहे. तसेच, गाडीवर शाईफेक करण्यात आली आहे. यावर मनोज जरांगेंना विचारले असता ते म्हणाले की, असे कुणीच कुणाशी करू नये. प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. काही जण असे आहेत की, ते स्वतः करतात आणि मराठ्यांवर नाव घालत आहेत. काही जण सहानुभूती मिळवण्यासाठी असे कटकारस्थान करत आहेत. मराठा असो किंवा ओबीसी असो असे कुणी नाही केलं पाहिजे, अस नको व्हायला.मराठ्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. मराठा एकटे दुश्मन आहेत का फक्त? ते ही मराठ्यांच्या मागे का लागलेत? ओबीसी मतं मिळवायला काही ठिकाणी स्टंट होत आहे. हा स्टंट असू शकतो. त्यांनी काही ठिकाणी स्टंट करून सहानुभूती मिळवायला नको, असे त्यांनी म्हटले आहे.