प्रतिनिधी : देशात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक जस जशी जवळ येत आहे. तास प्रचाराचा जोरही वाढत आहे. यातच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्तेचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. भाजपकडून तर 400 पारचा नारा दिला जात आहे. तसेच भाजपाचे घटकपक्ष याच नाऱ्यावर प्रचारसभा दणाणून सोडत आहेत. असं असताना मात्र, अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी अबकी बार 400 पार अशक्य असल्याचं म्हणाले आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजप आणि घटक पक्षांकडून 400 पारचा नारा दिला जात आहे. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळळ यांनी मात्र, 2014 आणि 2019 सारखा भाजपाचा मार्ग आता सहज सोपा राहिलेला नाही. त्यांनी दावा केलाय की, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाचे नेते शरद पवार या दोघांचे पक्ष फुटले आहेत. त्यामुळे त्यांच्या बाजूने लोकांची सहानुभूती आहे, ज्याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे. भुजबळ असंही म्हणाले की, NDA चा मार्गही यंदा फार कठीण आहे. तरीसुद्धा पतंप्रधान मोदींच्या क्षमतेवर लोकांना विश्वास आहे आणि लोकांना असं वाटतं की, त्यांनी तिसऱ्यांदा भारताचं नेतृत्व करावं. तसंच, त्यांनी नाशिक लोकसभेतून माघार घेण्यामागचं कारणही सांगितलं ते म्हणाले, मी कधी स्वत:साठी सीट मागत नाही. त्यामुळे नाशिकमधून तीन आठवड्यानंतरही नाव घोषित करण्यात आलं नाही, तेव्हा मी माघार घेतली.

भुजबळांनी एक वृतवाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखती दरम्यान त्यांनी अनेक विषयांवर भाष्य करताना, महाराष्ट्रात भाजपासाठी लोकसभा निवडणूक सोपी नसल्याचं त्यांनी म्हटलं. 2014 आणि 2019 मध्ये भाजपाच्या बाजूने लोकांचं मताधिक्य होतं. परंतु यावेळी मात्र राज्यातले दोन महत्त्वाचे पक्ष फुटले आहेत. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लोकांची सहानुभूती जास्त आहे.