मुंबई (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशमधील शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी झालेल्या हिंसाचारावर कोणी काही बोलणार आहे की नाही ? सध्या शेतकऱ्यांविरोधात सुरु असणारी क्रूर वागणूक हे भाजपचे अधिकृत धोरण आहे का ?, असा सवाल शिवसेना खा. संजय राऊत य़ांनी केला आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसाचारानंतर राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात शेतकऱ्यांबद्दल फार बोलत असतात.  उत्तर प्रदेशमध्ये जो प्रकार घडला, तो बाबू गेनू यांच्यावर ब्रिटीशांनी ट्रक चालवल्याच्या घटनेची आठवण करुन देणारा  आहे. त्याचप्रमाणे, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात ही क्रूर वागणूक का दिली जात आहे?,  शेतकरी देशद्रोही वाटले म्हणून अशी क्रूर कारवाई केली का?, विरोधी पक्षाला तिथे जायला बंदी घातली आहे, ही कोणती लोकशाही आहे?  असा प्रश्नही राऊतांनी केला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेमुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर घटनास्थळी विरोधी पक्षातील नेत्यांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.