मुंबई : काही दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत, भाजप स्वयंपूर्ण झाला असल्याचे सांगतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) गरज नसल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले होते. ज्यांनी राजकीय जन्म दिला, त्या संघालाच भाजप नष्ट करायला निघाला असून, हा पक्ष ‘आरएसएस’लाही नकली संघ म्हणून त्यावर बंदी घालू शकतो,’ अशी टीका शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होणार आहे. शनिवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी ‘इंडिया’तर्फे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
‘इंडिया’ आघाडी महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 46 जागा जिंकेल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अन्नसुरक्षा कायदा डॉ. मनमोहन सिंग सरकारचाच असल्याचा दावा यावेळी केला.
‘‘इंडिया’चे सरकार आल्यास 10 किलो मोफत धान्य देण्याची योजना ही नरेंद्र मोदींच्या योजनेवरून घेतली आहे, यात तथ्य नाही. डॉ. मनमोहनसिंग सरकारने अन्नसुरक्षा कायदा आणला व त्याअंतर्गत ही योजना आहे. ‘यूपीए’ सरकारनेच ही योजना आणली होती,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.‘निवडणुकीत सावरकर हा मुद्दाच नाही, तर त्यावर राहुल गांधी कशाला काय बोलतील,’ असा प्रश्नही त्यांनी मोदींनी राहुल यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना उपस्थित केला.
यावेळी या पत्रकार पत्रकार परिषदेला काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नितला, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते.